पंढरपूरसाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास मान्यता : आ. समाधान आवताडे

0
१२२ कोटींचा प्रकल्प : ११० कोटींचे अनुदान : ७ दिवसात निविदा ९१ दिवसात काम सुरु होणार

           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरासाठी १३ एम एल डी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रकल्पास  राज्य शासनाने गुरुवार ( दि. १२ ) रोजी मंजुरी  दिली असून १२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये १०९. ९० कोटी रुपये शासनाचे अनुदान असेल तर २२ कोटी रुपये पंढरपूर नगरपरिषदेचा हिस्सा असणार आहे. येत्या ७ दिवसात या कामाची निविदा निघणार असून ३ महिन्यात काम सुरु  होईल, दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर शहरातील सांडपाणी आणि मैला मिश्रित पाणी चंद्रभागेला येण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे. 
           गुरुवारी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेचा अध्यादेश काढला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. समाधान आवताडे पुढे म्हणाले की, पंढरपूर शहराची सध्याची मलनिःसारण यंत्रणा अपुरी ठरत असल्याने शहरातील सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी चंद्रभागा नदीत मिसळते आहे. याशिवाय उपनगरी भागातील सांडपाणी यमाई तलावात मिसळून हा तलाव प्रदूषित होत आहे. त्यामुळे वाढीव क्षमतेच्या मलनिःस्सारण प्राकल्पाची गरज होती. शिवाय शहराच्या चार भागातून सांडपाणी पंपिग करण्याची गरज होती. त्यामुळे या सर्वच कामासाठी राज्य शासनाने नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली होती. गुरुवारी मंजुरीचा आदेश निघाला आहे. 
          एकूण १३ एम एल डी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. यामध्ये इसबावी हद्दीत अक्षत बंगलोज, अहिल्या पूल, यमाई तलाव आणि लेंडकी नाला ( गोपाळपूर ) या चार ठिकाणी  १३ एम एल डी क्षमतेचे पंपिग स्टेशन असतील. तर गोपाळपूर हद्दीत मलनिःस्सारण केंद्राजवळ होणार आहे. यामध्ये शहरातील ३ हजार ७५६ मालमत्ता या नवीन योजनेस जोडल्या जातील आणि दररोज १३ एम एलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. येत्या ९ दिवसात या कामाची निविदा निघणार असून ४ वर्षात काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन १०९. ९० कोटी रुपये अनुदान देणार असून पंढरपूर नगरपालिकेस केवळ १० टक्के म्हणजे १२. २१ कोटी इतका निधी द्यावा लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रभागा, यमाई तलावाचे प्रदूषण पूर्णपणे बंद होणार आहे, अशीही  माहिती आ. अवताडे यांनी दिली. 
---------------------------------------------------
            मागील अनेक वर्षांपासून शहर आणि उपनगरी भागातील सांडपाणी आणि मैला मिश्रित पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता. चंद्रभागा नदी, यमाई तलावाचे  प्रदूषण वाढले होते. त्यामुळे  या मलनिस्सारण प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे  सातत्याने पाठपुरावा केला आहे. विधानसभेत या प्रश्नांवर लक्षवेधी मांडलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प अखेर मंजूर झाला. याबाबद्दल राज्य शासन आणि मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद 
                       आ. समाधान आवताडे
---------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)